आज ‘अंमली पदार्थ विरोधी’ दिन

0
947
  • डॉ. सुषमा कीर्तनी (पणजी)

‘‘प्रथम ऐका – मुलांना व तरुणांना निरोगी व ज्ञानी बनविण्यासाठी मदत करण्याची पहिली पायरी म्हणजे प्रथम त्यांचे ऐकून घ्या.’’
अमली पदार्थांचा वापर टाळण्यास मदत करण्याचे हे पहिले पाऊल असून ते विज्ञानावर आधारित आहे व त्यामुळे मुले व तरुणांचे आयुष्य बनविण्यास उपयोगी ठरणार आहे.

तरुणांना सामाजिक कार्यामंध्ये गुंतवून किंवा सामावून घेतले पाहिजे, कायद्याची अमलबजावणी समजावून दिली पाहिजे, सगळे नियम-कायदे त्यांना समजावून सांगून ते त्यांचे पालन काटेकोरपणे करतात की नाही याकडे लक्ष द्यायला हवे, समाजातील अमली पदार्थांचे धोकादायक परिणाम मुलांना व पालकांना समजावण्यासाठी कार्यक्रम घ्यावेत.

युएन जनरल असेंब्लीने २६ जून हा दिवस ‘अंमली पदार्थ विरोधी दिन’ पाळायचा’ आणि जगभरात चालू असलेल्या अमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापारावर नियंत्रण आणायचे आणि जागतिक सोसायटीचे उद्दिष्ट – संपूर्ण सोसायटी अमली पदार्थमुक्त करण्याचे – पूर्ण कसे होईल यासाठी प्रयत्न करायचा. सर्वप्रथम हा निर्णय १९८७ मध्ये युएनच्या समोर मांडला गेला जेणे करून बेकायदेशीर अमली पदार्थांचा वापर जी जगासमोरील सर्वांत मोठी समस्या होती त्याला वाचा फुटली.
२०१८ वर्षाचा विषय (थीम) …
‘‘प्रथम ऐका – मुलांना व तरुणांना निरोगी व ज्ञानी बनविण्यासाठी मदत करण्याची पहिली पायरी म्हणजे प्रथम त्यांचे ऐकून घ्या.’’
अमली पदार्थांचा वापर टाळण्यास मदत करण्याचे हे पहिले पाऊल असून ते विज्ञानावर आधारित आहे व त्यामुळे मुले व तरुणांचे आयुष्य बनविण्यास उपयोगी ठरणार आहे. त्यांचे कुटुंब आणि त्यांचा समाज हा आज सर्वांत गंभीर परिणामांचा सामना करतो आहे. तरुणांच्या आरोग्याच्या समस्यांबरोबरच त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत- जसे आर्थिक नुकसान, समाजविघातक वागणूक म्हणजे चोरी, हिंसा आणि गुन्हेगारी जो समाजाला लागलेला एक कलंक आहे. भारत सरकारने १९८८ मध्ये कायदा केला. मोठ्या शहरांमध्ये दारूच्या वापरासोबतच या अमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बदलत चाललेली कौटुंबिक रचना आणि मित्रांचा वाढता दबाव ही काही कारणे याच्यामागे असावीत.
अमली पदार्थांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तींमध्ये काही गोष्टी दिसून येतात..
१) शारीरिक आरोग्य – अंमली पदार्थं सोडल्यानंतर दिसून येणारी लक्षणे, वाढती झोप किंवा सुस्ती, कोकेनमुळे वाढणारी हृदयाच्या ठोक्यांची गती आणि अल्कोहोलमुळे हातांमध्ये आलेला कंप.
२) मानससास्त्रीय आणि मानसिक आरोग्य – नैराश्य, चिंता
– बदलणारे मूड (मनःस्थिती), झोपण्यातील अडथळे
– रोजच्या कामातील आवड कमी होणे
– गोंधळ/भ्रम/नशा सोडल्यामुळे होणारा त्रास
– कुठलीही औषधे जास्त दिवस घेतल्यामुळे पुढे त्यांची मात्रा वाढवावी लागते
– धोकादायक मनःस्थितीत राहण्याची इच्छा.
३) सामाजिक विषय – चोरी, गुन्हा, हिंसा, आतंकवाद, समाज विघातक वागणूक, पैशांची गैरवाजवी मागणी.
रस्त्यावर किंवा फुटपाथवर राहणारी बरीच मुले ज्यांना भीक मागून किंवा लहान मुलांनासुद्धा मजुरी करून रहावे लागते त्यांना अमली पदार्थांच्या मार्गाने गेल्यास आपले कष्ट कमी होतील किंवा दुष्टांच्या तावडीतून आपली सुटका होईल, असे वाटते. दिल्ली कमिशनकडे आलेल्या लहान मुलांच्या दयाअर्जाच्या केसेसमध्ये असे आढळून आले की जास्तीत जास्त केसेस या अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकलेल्या होत्या. फुटपाथवर राहणारी मुले बरेच वेळा स्वस्त अमली पदार्थ वापरतात जसे रबर ग्लू. याच्यामुळे त्यांना रोजच्या त्रासातून जसे लैंगिक, शारीरिक किंवा मानसिक छळातून मुक्ती मिळते.

मित्रमैत्रिणींचा दबाव, अभ्यासाचा ताण, दारूचे व्यसन किंवा आईवडलांना असलेली अमली पदार्थांची सवय, एकच पालक असणे, आई-वडलांचे संबंध तणावपूर्ण असणे, पालक-पाल्यामध्ये सुदृढ संबंध नसणे इत्यादी कारणांमुळे मुलं अमली पदार्थांच्या आहारी जातात आणि त्यातच बुडून राहतात.

रस्त्यावर मिळणारे नशीली पदार्थ हे सहज उपलब्ध असतात. तंबाखू आणि दारू हे शाळकरी मुलांमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात जसे ४० ते ८०% वापरले जातात. तरुणांवर मित्रांचा दबाव असतो, किंवा त्यांना प्रयोग करून बघायचा असतो आणि त्यांना त्यांच्या मित्रांनी स्वीकारावं असं त्यांना वाटत असतं.

नवयुवक आणि अंमली पदार्थांचा नशा –
किशोरवयीन काळ या अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकण्याचा व त्यांचा बेकायदेशीर व्यापार करण्याचा काळ आहे. प्रोत्साहक वागणूकच त्यांना चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त करते. शिवाय खालील काही कारणे आहेत… १. आत्मविश्‍वासाची कमी, २. मानसशास्त्रीय अडथळे, ३. प्रवृत्त करणारे घटक, ४. मित्रमैत्रिणींना नाही म्हणण्याचे किंवा विरोध करण्याचे कौशल्य नसणे, ५. अकाली लैंगिक सक्रीयता, ६. किशोरावस्थेत गर्भधारणा, ७. समाजविघातक वागणूक, ८. शिक्षणात अपयश, ९. सकारात्मक निरोगी वागणुकीबद्दलचे अज्ञान असणे, १०. दारु किंवा अमली पदार्थ वापरणे म्हणजे ‘शान’ची गोष्ट आहे. ११. एखाद्या गँग किंवा गटामध्ये सामील असणे.

बर्‍याच वेळा यामध्ये कुटुंबसुद्धा जबाबदार असते- जसे पालकांना दारु किंवा नशेची सवय असणे, नात्यातील दुरावा, मुलांबरोबर चांगला वेळ घालवण्याची सवय नसणे, दारू किंवा अमली पदार्थांच्या सेवनाबाबत नियम व त्यांच्या परिणामांबद्दल स्पष्ट कल्पना नसणे, कुटुंबातील भांडणाचा परिणाम, घरगुती हिंसा, नोकरी किंवा कामधंदा नसणे.

किशोरवयीन मुले या सवयीमध्ये अटकण्यास कारणीभूत शाळा आणि समाजही मुख्य भूमिका निभावताना दिसतात. शिक्षणात अपयश, शिक्षकांकडून चुकीचा सल्ला, चुकीचे उत्तेजन, शाळेशी असलेल्या जबाबदारीची जाणीव नसल्यामुळे नवतरुण वाहवत जाऊन ड्रग रॅकेटमध्ये अडकला जाऊ शकतो.
म्हणूनच घर, शाळा आणि समाजातर्फे दीर्घकालीन प्रयत्न होणे अत्यावश्यक आहेत.
* कुटुंबातर्फे करता येण्यासारखे बचावात्मक उपाय किंवा घटक….
१) घट्ट कौटुंबिक संबंध किंवा नाते प्रस्थापित करणे.
२) पालकांमध्ये असलेलं सामंजस्य
३) शिक्षणासाठी प्रेरणा देणे
४) विद्यार्थ्यांना ताणाशी सामना करण्याचे शिक्षण देणे
५) दारू आणि अमली पदार्थांच्या संयत वापराबद्दलचे ज्ञान तसेच अपेक्षांबद्दल पालकांनी स्पष्ट जाणीव मुलांना करून द्यायला हवी.
६) कौटुंबिक निर्णयात पाल्यांना सामील करा आणि त्यांच्यासोबत एखादी जबाबदारी वाटून घ्या.
७) कुटुंबातील सदस्य हे पोषक आणि सहकार्य करणारे असले पाहिजेत.
शाळासुद्धा तरुणांना गुंतवून ठेवून शाळेबद्दल त्यांच्या मनात एक घट्ट आणि सकारात्मक नाते निर्माण करू शकतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येण्याबद्दल प्रोत्साहित केले पाहिजे, त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी व चांगल्या वागणुकीसाठी प्रोत्साहित केले पाहिजे, शैक्षणिक ध्येय मिळवण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे आणि त्यांच्यात नेतृत्व गुण आणि निर्णयक्षमता वाढीस लागेल यासाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात, त्यांना शाळेच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करावयास हवे व शाळांनी विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

समाजसुद्धा या अंमली पदार्थ विरोधी चळवळीचा एक भाग होऊ शकतो…. कसे? – तरुणांना सामाजिक कार्यामंध्ये गुंतवून किंवा सामावून घेतले पाहिजे, कायद्याची अमलबजावणी समजावून दिली पाहिजे, सगळे नियम-कायदे त्यांना समजावून सांगून ते त्यांचे पालन काटेकोरपणे करतात की नाही याकडे लक्ष द्यायला हवे, समाजातील अमली पदार्थांचे धोकादायक परिणाम मुलांना व पालकांना समजावण्यासाठी कार्यक्रम घ्यावेत आणि त्यांच्याविषयीचे धोके मुलांना व पालकांना समजावून सांगावे.
गोवा हे सुंदर राज्य आहे व पृथ्वीवरील स्वर्ग आहे. गोव्यातील किनारी भागांमध्ये अमली पदार्थांचा उपयोग वाढत्या प्रमाणात होत असून पर्यटनामुळे याचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. अमली पदार्थ उपलब्ध करून देणार्‍यांवर कायद्याचा बडगा उगारायला हवा. त्यांचा उपयोग करणार्‍यांनाच नेहमी पकडलं जातं व शिक्षा केली जाते आणि हे उपलब्ध करून देणारे दुसर्‍या गिर्‍हाईकांना पकडतात जे त्यांच्या उत्पादकांची विक्री बाजारात करीत राहतात.