आजच्या मुलांची मानसिकता ओळखा…

0
886

देवेश कु. कडकडे (डिचोली)

केवळ गुण मिळवले म्हणजे मुलांची बुद्धिमत्ता ठरते ही धारणाच मुळी चुकीची आहे. नापास झालेली मुलेही समाजात पुढे भरीव कार्य करू शकतात हे सिद्ध झाले आहे. आपल्या मुलांची क्षमता ओळखूनच ती वाढवण्यासाठी आणि क्रियाशील रुप देण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. त्यासाठी आपल्या मुलांशी मनमोकळेपणाने बोलण्यासाठी वेळ काढायला हवा…

आज सगळा समाजच मुलांच्या वाढत्या आक्रमक आणि बेताल वागणुकीमुळे चक्रावून गेला आहे. आजची मुले आईवडीलांनी सांगितलेले ऐकत नाहीत. आधीची मुले अमूक एक गोष्ट कर म्हटल्यावर ऐकायची. का? म्हणून विचारत नव्हती. चित्रपट, दूरदर्शन, इंटरनेटवरील हिंसेचे, लैंगिततेचे अनिर्बंध उदात्तीकरण, हिंसेच्या भावनेला खतपाणी घालणे, मुलांना उत्तेजित करणार्‍या व्हिडिओ गेम्स, मुलांची बिघडलेल्या मित्र-मैत्रिणींची संगत, त्यांच्याकडे पालकांचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष, स्वतः पालकांचे बेताल वागणे, आजूबाजूला फोफावत चाललेला चंगळवाद. या सगळ्यांचा यात थोडा थोडा वाटा आहे.
मुलांचे मनस्वास्थ्य ठीक नसेल, मूल्ये ढासळलेली असतील, कल्पनाविश्‍वात वावरायची सवय लागलेली असेल, तर मुले अयोग्य व चुकीचे निर्णय घेऊ शकतात, चुकीचे वागले जाऊ शकते. विचार वजा केला की माणूस पशू किंवा यंत्र बनतो. गुणी, समंजस, हरहुन्नरी मुले सगळ्यांनाच आवडतात. परंतु तसे घडवणे आपल्या हातात असते. त्यात आपण कितपत यशस्वी होतो?
एकत्र कुटुंब हीच आपली पारंपरिक पद्धत होती. पूर्वी घरात खूप माणसे असल्यामुळे मुले कशी मोठी व्हायची हे आईवडिलांना कळायचे नाही. घरात मोठे कुटुंब. त्यामुळे समवयस्क मुले एकमेकांबरोबर खेळायची, शाळेत जायची, मिळून अभ्यास करायची, झाडावर चढायची, नदीत पोहायला, सायकल चालवायला शिकायची. हे सगळे आपोआपच व्हायचे. आज काही ठिकाणी एकाच घरात विभक्त कुटुंबे राहतात. त्यांच्यामधून विस्तवही जात नाही. दोघे भाऊ, सासू-सूना, जावा-जावा आपापसात भांडतात. एकमेकांचे वाभाडे काढतात. मोठ्याने आवाज निघतात तेव्हा काही तरी चुकीचे, भीतीदायक घडते याची जाणीव होत असते. या घटना मेंदूच्या स्मरणकप्प्यात घट्ट रुतून बसतात. जिथे जिव्हाळा नाही त्या एकत्र कुटुंबाचेही दुष्परिणाम जास्त होतात. आईबाप करतात तसेच करायला मुलांना आवडते. आपल्या अवतीभोवती फिरणार्‍यांचे बोलणे, वागणे टिपकागदाप्रमाणे टिपून घेतात. सभोवतालच्या वागण्यातून, भावनेतून मुलांवर संस्कार होतात.
प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञांचे असे मत आहे की आयुष्यात निर्माण होणार्‍या बहुतेक मनोविकारांचे मूळ बालपणात आढळेल. या वयात ज्या त्रासदायक अथवा दुर्दैवी घटना घडतात त्या घटनांतून मुले खूप काही शिकतात. यातील काही घटना मुलांच्या दृष्टीने खूपच त्रासदायक आणि उपद्रवी असतात. आपण मुलाला, तू मूर्ख आहेस, तू कुरुप आहेस, अडाणी आहेस अशी नावे ठेवली तर त्यामुळे मुलांत सूडाची भावना उत्पन्न होते. सतत चिंता आणि काळजी तयार होते. अयोग्य वागणूक आणि लक्षणे तयार होतात. हळूहळू घरापासून लांब लांब राहू लागतात. रात्री अपरात्री घरी येणे किंवा रात्रभर घराबाहेर राहणे, दारू, अंमली पदार्थ, जुगार यांसारखी व्यसने कवटाळणे, मुलींची छेड काढणे, चोरी, दरोडा, मारामारी, बलात्कारासारखे गुन्हे घडतात.
प्रत्येक मुलाच्या आयुष्यात चार ते सहा वर्षे वय अत्यंत महत्त्वाचे असते. या वयातील मुलगा असेल तर त्याला आईचे प्रेम एकट्याला मिळावे आणि मुलगी असेल तर तिला वडिलांच्या प्रेमात भागीदार नको असतो. या काळात मुलांचे विश्‍व हे आई-बाबा, आजी-आजोबा, यापर्यंतच सीमित असते. पुढे शाळेच्या माध्यमातून मित्र-मैत्रिणी, अभ्यास, शिक्षकांशी सहवासाला महत्त्व येते. या वर्षांत जे अनुभव मुले घेतात त्यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाची बांधणी होते.
आपण मुलांना सद्वचन केवळ जिभेवर घोळायला लावतो. ते सद्वचन मन, बुद्धी आणि कर्म यांनी अभिमंत्रित केले तरच मुले सुसंस्कृत बनतील. शाळेत आजही अश्‍वत्थाम्याला पाण्यात पीठ कालवून दूध म्हणून पाजले जाते. केवळ पोपटपंची करणारे पाठांतर केले जाते. सर्वप्रथम आपण मुलांना मातृभाषेतून शिक्षण न देता इंग्रजी माध्यमातून सामोरे जाण्यास पुढे उभे करून त्यांना नकळत तणावाखाली नेण्याची सुरुवात करीत असतो.
आज घराघरात एकच मूल ही संकल्पना वाढत आहे. पण त्या एकाकडून भरपूर अपेक्षा असतात. त्यांना ओढ मुलाच्या ज्ञानाची नव्हे तर गुणांची वाटू लागली आहे. त्यामुळे पालकांचा दरारा सहन करीत मुलांना एका अनामिक भीतीने ग्रासले जाते. काही ठिकाणी तर विपरित स्थिती निर्माण होऊ लागली आहे. पालकच मुलांना घाबरू लागले आहेत. याचे कारण अतिलाडामुळे मुले शेफारू लागली आहेत, जी जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन एका दगडात दोन पक्षी मारतात. अतिलाडाचे विपरित परिणाम, अनेक समस्या अंगावर येऊ लागल्या.
आज आईवडील मुलांच्या वागण्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. मुले मोबाईल, लॅपटॉप यात मान खुपसून बसतात. ते काय दिवे लावतात याची जाणीवही त्यांना नसते. रटाळ, कळलाव्या मालिका पाहण्यात आईवडीलही मशगुल होतात. अभ्यासाच्या बाबतीत पालक ‘रिंगमास्टर’ होत आहेत. याचा मुलांवर ताण पडतो. परंतु भीती, दबाव यामुळे त्यांना बोलून दाखवता येत नाही. त्यांच्या वागण्यातून त्यांचे ताण प्रगट होतात. त्यामुळे आपण मुलांचे मार्गदर्शक व्हावे, हुकूमशहा होऊ नये. मुलांकडून गुणांची अवास्तव अपेक्षा करू नये. कारण केवळ गुण मिळवले म्हणजे मुलांची बुद्धिमत्ता ठरते ही धारणाच मुळी चुकीची आहे. नापास झालेली मुलेही समाजात पुढे भरीव कार्य करू शकतात हे सिद्ध झाले आहे. आपल्या मुलांची क्षमता ओळखूनच ती वाढवण्यासाठी आणि क्रियाशील रुप देण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. त्यासाठी आपल्या मुलांशी मनमोकळेपणाने बोलण्यासाठी वेळ काढायला हवा. ‘अभ्यास कर’ हाच एक मंत्र मुलांना सतत ऐकवला जातो. मात्र त्यांना अवांतर वाचनासाठी प्रोत्साहित केले जात नाही. वाचनाने त्यांची प्रगल्भता वाढेल. विचार करण्याची क्षमता वाढेल. आपल्या मुलांना, नवीन पिढीला नवीन विचारांची शिदोरी द्यायची आहे. त्यांच्यात सुरक्षितपणाची भावना, आत्मविश्‍वास, सृजनशिलता वगैरे निर्माण होईल, जेणेकरून ती मुले या समाजव्यवस्थेला सामोरे जायला ताठ उभी राहू शकतील.