आंबा खरेदी करताय? ….सावधान!

0
267
  • श्रीरंग जांभळे

गोव्यातील शेतकरी व गोवेकर व्यापारी आंबा उत्पादन व काढणीपश्‍चात प्रक्रिया करून आंबा ग्राहकाला देण्यात प्रामाणिक असले तरी नफेखोरीच्या उद्देशाने प्रेरित गोव्याबाहेरचा माल गोव्यात उपलब्ध करून देणारे व्यापारी नुकसान कमी करणे व झटपट नफा कमावणे यासाठी काही रसायनांचा वापर आंबा व इतर फळे पिकवण्यासाठी करताना आढळतात.

गोव्यात आणि कोकणात, उन्हाळा सुरू झाला की विविध फळफळावल अवतरायला सुरुवात होते. डोंगरावरची, माळरानावरची फळे खाण्यासाठी गावातील मुले झाडाझुडपांत फिरून फळे तोडून आणतात, खातात, मजा लुटतात. गावातील व शहरातील व्यस्त मुलांना व त्यांच्या पालकांना बाजारात मिळणार्‍या फळांची चव चाखून समाधान मानावे लागते. या सर्व फळांमध्ये आंबा हा सर्वांचे आकर्षण. आंबा बाजारात अवतरला की वर्षभर मिळणार्‍या केळी, चिकू, सफरचंद, मोसंबी यांसारख्या फळांचे महत्त्व २-३ महिन्यांसाठी कमी होते. फळांच्या राजाचा रंग, सुवास, स्वाद अशा दिमाखदार घटकांची चर्चा सर्वदूर ऐकायला मिळते. आंबा उत्पादक, आंबा बागातले कामगार, व्यापारी ते शेवटच्या ग्राहकापर्यंतच नव्हे तर आंबा प्रक्रिया व्यवसायातील सर्वच घटकांची लगबग वाढते.

यंदाचे चित्र मात्र जरा वेगळे आहे. वर्तमानपत्रांतूनही आंब्याचे चढे दर समोर ठेवून काढलेली व्यंगचित्रे पाहायला मिळतात. आंब्याचे पीक थोड्याफार प्रतिकूल हवामानामुळे कमी असल्याच्या वार्ता ऐकायला व वाचायला मिळतात. गोव्याच्या शेजारील कर्नाटकातील धारवाड व बेळगाव जिल्हे, तसेच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हे हे आंब्यासाठी प्रसिद्ध. पण तिथेही उत्पादनात यंदा ४० ते ५० टक्के घट असल्याचे तज्ज्ञ व शेतकरी सांगतात.

गोव्याच्या कृषिखात्याने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील ४,५०० हेक्टरच्या आसपास क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. गोव्याच्या ‘मानकुराद’चा बाजारात अजून दम पाहायला मिळत नाही. उत्पादनात घट असल्याचे पाहायला मिळते. कर्नाटकातील धारवाड व बेळगाव हे जिल्हे हापूस आंब्याच्या लागवडीसाठी प्रसिद्ध असून कर्नाटक राज्याच्या एकूण मागणीपैकी ५० टक्के मागणी या जिल्ह्यातील आंबा उत्पादनामुळे पूर्ण होते. परंतु यंदाच्या अवकाळी पावसामुळे व आंब्यावरील एका नव्या रोगामुळे तेथील आंब्याचे उत्पादन ४० ते ६० टक्के घटल्याचे कृषिखात्याचे अधिकारी सांगतात. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस व हवामानातील बदलांमुळे परत आलेला फुलोरा, फळांची गळ, यामुळे उत्पादनात ४० टक्के घट असल्याचे तज्ज्ञ व शेतकरी सांगतात. अर्थात, यामुळे यावर्षी कमी प्रमाणात आंबा बाजारात येणार हे स्पष्ट आहे.

बाजारातील कमी आंब्याची आवक लक्षात घेऊन व्यापारी त्वरित व जास्तीत जास्त नफा कमवण्याकडे लक्ष देत आहेत. आंबा काढणीनंतर ग्राहकांपर्यंत पोचायला विविध टप्पे पार करावे लागतात. आंबा उत्पादन ते ग्राहक हे अंतर फार कमी असेल तर योग्य प्रमाणात तयार झालेला व चांगला आंबा योग्य किमतीत ग्राहकाला मिळणे शक्य होते; अन्यथा पॅकिंग, वाहतूक, साठवणूक अशा टप्प्यांतून जाण्यासाठी वेळ व खर्चही वाढतो. साठवणुकीचा खर्च वाचवणे, साठवणुकीच्या दरम्यान खराब होणारा आंबा हा नुकसानदायक मुद्दाच निकालात काढणे व तसेच आकर्षक रंगाचे फळ ग्राहकासमोर पेश करण्याच्या उद्देशाने फळ लवकर पिकवण्यासाठी विविध कृत्रिम मार्ग अवलंबले जातात.

आंबा पिकवण्याच्या विविध पद्धती
आंबा झाडावरून काढताना जून/तयार होणे प्रत सुधारण्याच्या दृष्टीने आवश्यक असते. असा तयार झालेला आंबा नैसर्गिकरीत्या पिकल्यानंतर गोड लागतो. प्रत्येक जातीनुसार फळाचा रंग वेगळा असतोच व चवीतही फरक असतो. प्रत्येक जातीच्या फळाची टिकून राहण्याची क्षमताही वेगळी असते. या सर्व गोष्टी लक्षात घेता आंबा झाडावरून काढल्यानंतर चांगल्या प्रतीचा पिकलेला आंबा ग्राहकाला मिळणे यासाठी योग्य तंत्र अवलंबणे आवश्यक असते.

आंबा उत्पादक शेतकरी आंबा पिकवताना पारंपरिक पद्धतीचा अवलंब करतात. आढीत गवताच्या सहाय्याने आंबा पिकवण्याचे हे तंत्र. यात एका बाजूने जसा आंबा चांगला पिकतो तसाच काही आंबे खराब होण्याची शक्यताही असते. पिकलेला आंबा त्याचे डहशश्रष श्रळषश संपल्यावर काळा पडतो, कुजतो. यामुळे यात काही प्रमाणात नुकसानही होते. यासाठी विपणनाची चांगली यंत्रणा हाताशी असणे नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने आवश्यक असते. परंतु आता आंबे काढणी व इतर कामांसाठी वेळेत व कुशल मजूर मिळणे कठीण झाल्याने उत्पादनचक्राच्या विविध टप्प्यांमध्ये बदल झालेले आढळतात. शेतकर्‍याला प्रत्यक्ष उत्पादनातच लक्ष घालताना किचकट व्यवस्थापनाला व त्यातील अडचणींना इतके सामोरे जावे लागते की, यासाठी काढणी व विक्री या खर्‍या अर्थाने नफा मिळवून देणार्‍या गोष्टी शेतकरी स्वतः करू शकत नाही. त्यामुळे आंबा तयार होण्यापूर्वीच काढणी व काढणीपश्‍चात कामे करणार्‍या व्यापार्‍यांना ही झाडे दिली जातात. हे व्यापारी मग आंबे काढून, पिकवून नंतर आंबे ग्राहकापर्यंत पोचवण्याची आपापली यंत्रणा उभी करतात.

गोव्यातील शेतकरी व गोवेकर व्यापारी आंबा उत्पादन व काढणीपश्‍चात प्रक्रिया करून आंबा ग्राहकाला देण्यात प्रामाणिक असले तरी नफेखोरीच्या उद्देशाने प्रेरित गोव्याबाहेरचा माल गोव्यात उपलब्ध करून देणारे व्यापारी नुकसान कमी करणे व झटपट नफा कमावणे यासाठी काही रसायनांचा वापर आंबा व इतर फळे पिकवण्यासाठी करताना आढळतात. आंबा पिकवण्यासाठी इथिलीन , इथेफॉन यांसोबतच अत्यंत घातक अशा कॅल्शियम कार्बाईड इत्यादी रसायनांचा वापर करण्यात येतो.

हवेतील इथिलीनचे अत्यल्प प्रमाण फळामध्ये पिकण्याची प्रक्रिया सुरू होण्यास पुरेसे ठरते. बाहेरून इथिलीनचा वापर ऍवाकाडो, केळी, आंबा, पपई यांसारख्या फळांमध्ये पिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू करते. यामुळे फळे नैसर्गिक वेळेपेक्षा थोडी आधी पिकतात. इथेफॉनमुळे कॅल्शियम कार्बाईडपेक्षा थोडी लवकर फळे पिकतात. नैसर्गिकरीत्या पिकलेल्या फळांपेक्षा इथेफॉनमुळे पिकलेल्या फळांचा रंग जास्त आकर्षक असतो. तसेच या पद्धतीने पिकवलेली फळे कॅल्शियम कार्बाईडने पिकवलेल्या फळांपेक्षा टिकाऊ असतात. इथिलीन व इथेफॉनच्या सहाय्याने मर्यादित प्रमाणात वापर करून फळे पिकवण्यास भारत व अन्य विकसनशील देशांत मान्यता आहे. परंतु कॅल्शियम कार्बाईडचा वापर हा फारच घातक असल्याचे सिद्ध झाले आहे.
जास्तशी फळे बागेतून काढल्यावर दूरवरच्या बाजारात पाठवली जातात. यासाठी रेफ्रिजरेटेड वाहनातून अथवा साध्या वाहनातून काही दिवसांच्या प्रवासानंतर फळे पोचतात. अंतिम ग्राहकापर्यंत पोचण्यापूर्वी या फळांमध्ये पिकण्याची प्रक्रिया सुरू होते. यासाठी व्यापारी फळे भरलेल्या पेट्यांच्या शेजारी कागदात गुंडाळून थोडे कॅल्शियम कार्बाईड ठेवून देतात. फळांमधील आर्द्रतेमुळे रासायनिक प्रक्रिया होऊन उष्णता व ऍसिटिलीन गॅस तयार होतो व फळे पिकण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर ही फळे थंड पाण्यात तापमान कमी करण्यासाठी ठेवली जातात. यामुळे फळांना आकर्षक रंग प्राप्त होतो. परंतु अशा प्रकारे कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून पिकवलेली फळे जरा मऊसर व बेचव लागतात.

कॅल्शियम कार्बाईड हे कर्करोगाला आमंत्रण देणारे रसायन आहे. याचे अत्यल्प प्रमाणही शरीरात व्याधीना जन्म देते. यकृतावर याचे घातक परिणाम होतात. यात आर्सेनिक (रीीशपळल) व फॉस्फरस हाईड्राईड (झहेीर्हिेीीी हूवीळवश) चे अंश असल्याने याचे शरीरातील विविध भागांवर घातक परिणाम होतात. उलटी होणे, छातीत व पोटात जळजळणे, तहान लागणे, थकवा जाणवणे, डोळे व त्वचा चुरचुरणे, घसा दुखणे, श्‍वास घेताना त्रास होणे अशा विविध व्याधी या रसायनांमुळे होतात. कृत्रिमरीत्या पिकवलेल्या फळांच्या सेवनाने पोट बिघडते व जास्त काळ या रसायनांशी संपर्क आल्यास अल्सर होतो. एका ठरावीक मर्यादेबाहेर ऍसिटिलीन शरीरात गेल्यास ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मज्जातंतूंशी संबंधित विकार जडू शकतात. कार्बाईडच्या विषबाधेमुळे डोकेदुखी, विस्मरण, गोंधळ उडणे, झोप येणे असे विकार जडल्याचे अहवाल आहेत. हे दुष्परिणाम लवकर लक्षात येत असले व यामुळे दगावण्यापूर्वीच उपचार करून जीव वाचवता येत असला तरी गर्भवती महिला याला बळी पडून गर्भपात होऊ शकतो.

कृत्रिमरीत्या पिकवलेली फळे कशी ओळखावीत?
ज्याप्रमाणे जे झळाळते ते सर्व सोने नसते, तसेच जी फळे बाहेरून फार आकर्षक दिसतात ती शरीराला चांगली असतीलच असे नाही. ज्या फळांमध्ये एकसारखा पक्व रंग दिसतो, ती फळे जास्त करून कृत्रिमपणे पिकवलेली असतात. नैसर्गिकरीत्या पिकलेली फळे पिकताना सर्वदूर एकच एक रंगछटा दिसत नाही. जेव्हा आंबे, पपई, केळी एकसमान रंगाची आढळतात तेव्हा कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला असण्याची जास्त शक्यता असते. केळ्यात हे सहजपणे लक्षात येते. अशी केळी पिवळसर हिरवी पण दांडा मात्र गडद हिरवा दिसतो. रंगाने फारच आकर्षक व एकसमान रंग असलेली पक्व दिसणारी फळे शक्यतो घेणे टाळा. फळे खाण्यापूर्वी चांगली धुणे व साल काढणे यामुळे आरोग्याला कमी धोका उद्भवतो.

नैसर्गिकरीत्या पिकलेली फळे खाण्यासाठी व पचण्यासाठी योग्य व आरोग्याला पोषक असतात. निसर्गात योग्य व पूर्ण वाढ झाल्यावरच गुंतागुंतीच्या प्रक्रियांनंतर फळे पिकतात. झाडावर असो वा काढणीनंतर असो, पिकल्यामुळे फळांमध्ये होणारे बदल हे ठळकपणे लक्षात येण्यासारखे असतात. आंब्यामध्ये फळाचा देठाकडील भाग (खांदे) विकसीत होतो. रंग पिवळट हिरवा किंवा फिकट हिरवा होतो. पिकल्यानंतर चव व वास यात बदल होतो. आर्द्रता, तापमान यासारखे घटक यात महत्त्वाची भूमिका बजावतात. याउलट रसायनांच्या सहाय्याने पिकवलेल्या फळात एकसारखा रंग सर्वत्र दिसतो. परंतु हे अकाली असल्याने चव व वास अशा फळांमध्ये विकसीत होत नाही.
यावर उपाययोजना…

फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यास कायद्याने मनाई आहे. अन्न सुरक्षा व आरोग्याचे रक्षण ही सरकारची नागरिकांप्रती प्राथमिकता असायला हवी. त्यानुसार अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अन्न व औषध प्राधिकरणाचे अधिकारी अशा बेकायदेशीर ठिकाणी छापे मारल्याच्या वार्ता आपण वृत्तपत्रांतून वाचतोच. परंतु तरीही कॅल्शियम कार्बाईडसारखी आरोग्याला घातक रसायने वापरण्याच्या घटना बर्‍याच ठिकाणी घडतात. यासाठी सामाजिक प्रहरी म्हणून अशा घटना लक्षात आल्यास संबंधित अधिकारिणीकडे तक्रार करून आपण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे.

कायद्याचा बडगा दाखवणे हा एकमेव उपाय यावर असता कामा नये. तामिळनाडूच्या एका जिल्ह्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत (ऋडडअ) एका कार्यालयाने फळविक्रेत्यांमध्ये फळे पिकवण्याच्या नव्या व कायदेशीर पद्धतीविषयी जागृती घडवून आणली. आंब्याच्या झाडातूनच स्रवलेले इथिलीन द्रवस्वरूपात वापरून आंबे पिकवण्याचे तंत्र विक्रेत्यांना दाखवून त्यांच्यात जागृती केल्याचे वृत्त दै. ‘हिंदू’त प्रसिद्ध झाल्याचे माझ्या वाचनात आले. असे द्रवरूप इथिलीन आंब्याच्या फळांवर फवारल्यास तयार आंबे एक-दोन दिवसांत पिकून ऋडडअ च्या मानकांप्रमाणे खाण्यास तयार होतात. हे शरीरास अपायकारक नसल्याचा त्यांचा दावा आहे. अशा जनजागृतीमुळे कॅल्शियम कार्बाईडसारख्या घातक रसायनांचा वापर कमी होऊन विक्रेतेही ग्राहकांना चांगले आंबे देऊ शकतात.

अशी उपाययोजना गोव्यातही अन्न व औषध प्रशासनाकडून आपण अपेक्षित धरू शकतो. तसेच कृषिउत्पन्न बाजार मंडळ कृषिमालाच्या विक्रीपोटी व्यापार्‍यांकडून मोठ्या प्रमाणात कर गोळा करते. तेव्हा हा कृषिमाल योग्य प्रतीचा ग्राहकाला मिळावा यासाठी आवश्यकतेनुसार ीळशिपळपस लहरालशीी, शीतगृह उभारून व्यापार्‍यांना योग्य सहकार्य करण्याची जबाबदारी मंडळाने घेतली पाहिजे. ग्राहकाला योग्य प्रतीचा, आरोग्यदायी कृषिमाल मिळावा यासाठी व्यापार्‍यांमध्ये जनजागृती करण्याचे कामही त्यानी करावे.

शेवटी ग्राहकही आपली फसवणूक होऊ नये यासाठी जागृत राहिला पाहिजे. म्हणून माहितीच्या व खात्रीशीर स्थानिक उत्पादक व व्यापार्‍याकडून आंबे व इतर कृषिमाल खरेदी केल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल व आपले आरोग्यही अबाधीत राहील नाही का?