अयोध्येत राममंदिराचे ऐतिहासिक भूमीपूजन

0
146

>> मोदी : राममंदिर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक

>> मोदींच्या उपस्थितीत सोहळा थाटात

गेल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्या नगरीत मंदिर भूमीपूजनाचा ऐतिहासिक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. पंतप्रधान मोदी यांनी जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या गर्जनेत मंदिराची कोनशिला स्थापन केली. भूमीपूजन झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना, हे मंदिर आपले आधुनिक प्रतीक बनेल. शाश्वत आस्थेचे, राष्ट्रीय भावनेचे प्रतीक बनेल. हे मंदिर येणार्‍या पिढ्यांना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा देईल. या मंदिरामुळे अयोध्येची प्रतिमाच नव्हे, तर येथील अर्थशास्त्रही बदलेल. प्रत्येक क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील. जगभरातील लोक प्रभूराम आणि माता जानकीचे दर्शन करायला येतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी १२ वाजून ४४ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर राम मंदिराचे भूमीपूजन केले. यासाठी केवळ ३२ सेकंदांचा शुभमुहूर्त होता. तत्पूर्वी, ३१ वर्षे जुन्या ९ शिलांचे पूजन केले. यावेळी चांदीच्या विटांची पूजा करण्यात आली. तत्पूर्वी त्यांनी हनुमानगढीमध्ये दर्शन घेतले आणि पूजा केली. यानंतर त्यांनी साष्टांग नमस्कार घालत रामलल्लांचे दर्शन घेतले. यादरम्यान त्यांनी राम मंदिराच्या परिसरामध्ये प्राजक्ताचे रोपटे लावले आहे. राम मंदिराच्या टपाल तिकिटाचेही मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर भूमीपूजन सोहळ्यास सुरुवात झाली.

नरेंद्र मोदींनी सियावर रामचंद्र की जय घोषणेने आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, अनेक शतके तंबूत राहिलेल्या रामलल्लांसाठी एक भव्य मंदिर बांधले जात आहे. रामजन्मभूमी आज मुक्त झाली आहे. आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्यावेळी आपले सर्वस्व अर्पण केले होते. गुलामगिरीच्या काळात स्वातंत्र्यासाठी आंदोलन झाले नाही, असे एकही ठिकाण नव्हते. १५ ऑगस्टचा दिवस त्या लाखो बलिदानाचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे राम मंदिरासाठी अनेक शतके, अनेक पिढ्यांनी अविरत, एकनिष्ठ प्रयत्न केलेत. आजचा दिवस त्या संकल्पाचे प्रतीक आहे.

शिवाजी महाराजांच्या
मावळ्यांचा दिला दाखला
मोदींनी यावेळी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभार मानले. आज प्रभू रामाचा जयघोष संपूर्ण जगभरात होत आहे असे सांगत त्यांनी सर्व देशवासीय आणि जगभरात असलेल्या भारतभक्त आणि रामभक्तांना शुभेच्छा दिल्या. ज्या पद्धतीने मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे माध्यम झाले, दलित, वंचित अशा समाजातील प्रत्येक घटकांनी महात्मा गांधींना सहयोग केला, तसेच आज देशातील प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराच्या निर्माणाचे काम सुरू झाले आहे. जसा रामसेतू तयार झाला, तसाच गावागावांतून आलेल्या विटा, माती, नद्यांचे पाणी येथे प्रेरणा देत आहे. ही अमोघ शक्ती आहे. हे न भूतो न भविष्यति आहे, असे मोदी म्हणाले.

मंचावर फक्त ५ मान्यवर
श्रीराम जन्मभूमी संकुलात भूमीपूजनाचा मंच तयार करण्यात आला होता. तेथे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महारम नृत्य गोपाल दास हे पाच मान्यवर उपस्थित होते.

मोदींमुळे ५०० वर्षांची
प्रतीक्षा संपली : योगी
या क्षणामागे ५०० वर्षांचा संघर्ष, साधना आहे. भारताची लोकतांत्रिक मूल्ये, कायदेशीर प्रक्रिया, संविधानाची संमती या सगळ्या प्रक्रियेतून जात आज हा दिवस दिसतो आहे. या क्षणाची वाट पाहत अनेक पिढ्या गेल्या. अनेक महापुरुषांनी बलिदान दिले. आपल्या डोळ्यांसमोर राममंदिर उभे राहावे अशी अनेकांची इच्छा होती. नरेंद्र मोदींनी कायदेशीर तसेच शांततेच्या मार्गाने समस्येचे निराकरण कसे केले जाते, हे दाखवून दिले आहे. नरेंद्र मोदींमुळे हा क्षण सत्यात उतरला आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.

भारताच्या नवनिर्माणाचा
शुभारंभ : मोहन भागवत

सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित करताना भारताला आत्मनिर्भर, स्वावलंबी करण्यासाठी ज्या आत्मविश्‍वासाची आवश्यकता होती त्याचे सगुणसाकार अनिष्ठान आज साकारले जात असल्याचे सांगितले. देशात आज प्रत्येकाच्या मनात आनंदाचा क्षण आहे, प्रत्येकात प्रभू श्रीराम आहेत. मुळात राम मंदिराच्या उभारणीचे काम सर्वांना वाटून देण्यात आले आहे. परंतु आपल्याला आपल्या मात्र मनातही अयोध्या वसवायची आहे. इथे अयोध्येत जसे मंदिर उभे राहील तसेच आपल्या मनातही अयोध्या उभी राहायला हवी. हे मंदिर उभे राहण्यापूर्वी मनातील मंदिर उभे राहायला पाहिजे, असे भागवत मोठ्या विश्वासाने म्हणाले.