अयोध्याप्रश्‍नी सर्व अठराही फेरविचार याचिका फेटाळल्या

0
144

>> अखेर अयोध्या खटला बंद

अयोध्येतील राम जन्मभूमी प्रश्‍नावरून दाखल करण्यात आलेल्या सर्वच्या सर्व १८ ही फेरविचार याचिका काल फेटाळण्यात आल्या. या प्रकरणी देण्यात आलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि निर्मोही आखाड्यासहीत इतरांनी याचिका दाखल केल्या होत्या. त्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयातील ५ न्यायाधीशांच्या संविधापीठीने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे अखेर अयोध्या खटला बंद झाला आहे. अयोध्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देताना अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असल्याचे सांगितले होते. मात्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे पक्षकारांकडून ९ आणि इतरांकडून ९ अशा एकूण १८ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिकांचा फेटाळून लावल्या. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. या घटनापीठात न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, अशोक भूषण, एस. अब्दूल नजीर आणि संजीव खन्ना यांचा समावेश आहे.