अंगाला खाज सुटते का?..

0
3108

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी
खरेंच, तुमच्या अंगाला खाज सुटते का? आजकाल अशा रुग्णांची गर्दी वाढलेली आहे. ज्याला जीवनात अंगावर पुरळ कधीच उठले नव्हते, जे नेहमीच दिवसातून दोन वेळा आंघोळ करतात, त्यांनासुद्धा खाज येते म्हटल्यावर समाजात होणारे बदल व त्याने लोकांवर होणारे परिणाम आम्ही पाहतो.
आज बदललेल्या खाण्यामुळे किंवा आहारामुळे अंगाला खाज सुटते यात शंका नाही. पूर्वी खाण्यामुळे थोडेच लोक अंगाला खाज सुटली म्हणून यायचे. पण आज हे प्रमाण खूप वाढलेले दिसते आहे. त्याची कारणे कोणती..?-१. खाण्यामुळे, २. वस्तूंमुळे, ३. गोळ्यांमुळे,
४. त्वचेचे विकार, ५. विविध आजार.
१) खाण्यामुळे: खाण्यामुळे अंगाला खाज सुटू शकते हे पहिल्याप्रथम आम्ही मान्य करुया.
एकदा एका माणसाने केव्हाच न खाल्लेले खेकडे खाल्ले.. ते खाल्ल्यावर एक-दीड तासात लगेचच त्यांच्या अंगावर पुरळ उठले. खाज येऊ लागली. लगेचच अंग लाल झाले. पंधरा मिनिटातच खोकला यायला लागला. श्‍वास गुदमरायला लागला. तातडीने डॉक्टरला पाचारण केले. लगेचच डॉक्टरांनी इन्जेक्शन्स दिली. रुग्णाला इस्पितळात दाखल करण्यात आले. तोवर नाडी गुल झाली होती. आयव्ही चढवण्यात आले. रुग्ण वाचला. त्यानंतर तो माणूस आजवर खेकड्यांच्या वाटेला गेला नाही.
तर कोणते खाणे आपल्या शरीराला घातक ठरू शकते?…
१) शिंपले, कालवे, खेकडे, सुंगटे, लॉबस्टर्स, खुबे, शिनाणे वगैरे.
या वर दिलेल्या मासळीचे प्रकार शरीराला घातक ठरू शकतात. तेव्हा खाल्लेले नसेल तर थांबा! थोडेच खाऊन बघा. मगच पोटभर खा.
केव्हा थोड्यांना नेहमीचे जेवणही बाधते. खाण्यात नेहमीचेच पदार्थ मारक ठरू शकतात. उदा. अंडे, दूध, पीठ, बेसन, डाळीचे विविध प्रकार, दही, लोणी असे कितीतरी पदार्थ आहेत जे सेवन केल्यावर अंगाला खाज सुटते…!
२) वस्तूंमुळे ः आपण शरीरावर केलेल्या वस्तूंमुळे, अंगाला लागलेल्या कोणत्याही गोष्टीमुळेसुद्धा अंगाला खाज सुटते. एकदा एका शाळेचे शिबिर जंगलातील एका भागात गेली होती. जवळच पाणी होते. गावही जवळच होते. मोकळ्या जागेवर शिबिर सुरू झाले. दुसर्‍या दिवसापासून एकेकाच्या अंगाला खाज सुटू लागली. अंग लाल व्हायला लागले. कित्येकांची तोंडं मोठी झालीत -(सुजल्यामुळे) तातडीने त्यांना हॉस्पिटलात न्यावे लागले. पालक मंडळी धावतच शिबिरस्थळी पोहोचली… आपापल्या मुलांना घरी घेऊन गेली.
अंगाला सुटलेली खाज विशिष्ट झाडांमुळे झाली होती. शिबिराच्या सभोवार ती झुडुपे होती व साफसफाई करते वेळी मुलांचा त्या रानटी झाडांशी संपर्क झाला होता व त्यामुळे हा सगळा प्रकार घडला होता. भयानक चित्र होते ते! कपाळावर मळवट भरणार्‍या बायकांकडे बघा… कधी कधी कपाळावर लावलेल्या पिंजरमुळेही कपाळावर डाग उठतो व त्याला खाज येते.
विशिष्ट प्रकारचे सिंथेटिक कपडे वापरल्याने ही अंगावर पुरळ उठते. ‘निरमा’ साबणाने कित्येक गृहिणींचे हात सोलून काढले होते. साबणातील रसायनामुळे त्यांच्या हातांना चट्टे पडले होते… सालपटं निघाली होती… वर हाताला भयंकर खाज सुटली होती. तुम्ही हे जाणता.. हो ना!
आजकाल बाजारात नकली दागिने विकत मिळतात. सोन्याचे दागिने चोरांच्या भयाने कुणी घालायला घाबरतात. कारण आजकाल गळ्यातील मंगळसूत्रं ओढून काढली जातात. तेव्हा आजकाल बायका नकली दागिने घालतात व त्या दागिन्यांमुळे गळ्याला काळे डाग पडतात व नंतर पुरळ उठतो, गळ्याला खाज सुटते.
कधी कधी चष्म्यांचे कड चेहर्‍यावर खाज उत्पन्न करते. केसांना कलप लावणारे, मिशीवर कलप केलेले महाभाग दुसरे दिवशी मोठे झालेले तोंड घेऊन धावतच डॉक्टरांकडे येतात. कारण कलप करण्यास लागणारे साहित्य हे त्या माणसास घातक ठरू शकते. तेव्हा ते लावण्याअगोदर हातावर टेस्ट करून घ्या.
त्या दिवशी अंगाला प्रचंड खाज सुटून अंग लालभडक झालेला इसम पाहण्यात आला. आपल्याबरोबर त्याने एक किडा आणला होता. तो कॅटर पिलर म्हणजे कुसुंडा होता. मोठा.. काळाभोर.. तो त्याच्या अंगाला लागला होता. एवढेच कारण होते. पण त्याने त्याच्या अंगाची लाही लाही केली होती. विशिष्ट प्रकारचे कपडे (सिंथेटिक) अंगावर घातल्याने अंगावर पुरळ उठतात- चट्टे पडतात- खाज सुटते तेव्हा सांभाळा! कुठलीही वस्तू वापरताना सांभाळून वापरा.
३) गोळ्या-औषधे :
गोळ्या व औषधे शरीराला घातक ठरू शकतात. इंजेक्शनमुळे रुग्णाचा जीव धोक्यात पडतो. आजवर याच एका कारणामुळे डॉक्टरलोक रुग्णाला इन्जेक्शन देण्याचे टाळतात. रुग्णाच्या प्रकृतीप्रमाणे कुठलीही गोळी किंवा औषध त्याला मारक ठरू शकते. तेव्हा औषधे घेताना एक एक घ्या. म्हणजे कुठली गोळी मारक ठरते ते कळेल. मग ते तुमच्या डॉक्टरांना सांगा. कागदावर लिहून घ्या. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे कुठल्याही आजारानिमित्त जाल तेव्हा डॉक्टरांना ते सांगा.
खाण्यात एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. आजकाल लोकांच्या, मुलांच्या खाण्यात प्रचंड बदल झाले आहेत. त्यात जास्त फास्ट फूड, कुरकुरे, चिप्स, अगदी पाच-पाच रुपयांची पाकिटे बाजारात विकली जात आहेत. फास्ट फूडमध्ये तर नाना तर्‍हेचे रंग मिसळले जातात. तंदुरीवर तर ब्रश घेऊन रंग लावला जातो. त्यांच्या खाण्यामध्ये ऍजिनोमोटो नावाचा पदार्थ वापरला जातो. अक्षरशः पोत्यांनी ही वस्तू हॉटेलांमध्ये पोचवली जाते. कुठलाही फास्ट फूडचा प्रकार सांगा, तो बनवण्यासाठी या ऍजिनोमोटोचा वापर केला जातो. कारण त्याने म्हणे पदार्थाला चव येते व हा पदार्थ शरीराला अत्यंत घातक आहे. हा सेवन केल्याने अंगाला खाज येते. पुरळ उठतात. तेव्हा फास्ट फूड खाणार्‍यांनो, सावधान!!! तुमच्या अंगाला खाज सुटू शकते. तुम्हाला खाजवणे आवडेल का?..
४) त्वचेचे विकार – त्वचेचे विविध विकार आहेत ज्यामुळे अंगाला खाज सुटते- खरूज, नायटा, बुरशी (फंगस), वगैरे! आंघोळ न केल्यामुळे अंगावर घाम साचतो व त्वचेवर असलेल्या किंवा बाहेरून आलेल्या कृमींमुळे त्वचेचे रोग होतात. खाली मांडीवर, कंबरेवर, काखेत, मानेवर… हा पुरळ उठतो. बायकात हा प्रकार सर्रास आढळतो. हा रोग झालेल्या रुग्णाचे कपडे, साड्या, ब्लाऊज दुसर्‍याने वापरल्यास त्यालाही त्या कपड्यांवरच्या कृमींमुळे त्वचारोग होतात. तेव्हा स्वच्छता पाळा. दुसर्‍याचे कपडे वापरणे टाळा. रोग पळून जातील. त्वचेच्या रोगी माणसांच्या संपर्कात आलात तर तुम्हाला हे रोग होणारच!
५) विविध रोग : विविध प्रकारच्या रोगांमध्येही रुग्णाच्या अंगावर पुरळ उठून खाज येते. मधुमेही रुग्णांमध्ये हे दिसून येते. ज्यांना यकृताचे (लिव्हर) रोग आहेत त्यांनाही खाज येते. पोटात जंत झाले तरीही शरीरावर मोठाले चट्टे पडून खाज सुटते.
तेव्हा वाचकहो, सावधान रहा! आजकाल खतांशिवाय आणि जंतुनाशकाचा वापर केल्याविना कुठलेही पीक काढले जात नाही. तेव्हा घरी जेवणासाठी आणलेली भाजी, फळे चांगली गरम पाण्याने धुऊन घ्या व मगच वापरा.
आजकाल आम्हा भारतीयांच्या खाण्यातून काय जात नाही ते सांगा. कित्येक कारखाने आपले सांडपाणी नदीत टाकतात व त्या नदीचे पाणी आम्ही पिण्यास वापरतो. नदीतील मासे आम्ही खातो. तेव्हा हे सगळे वाचूनच तुमचे डोके जड झाले का?
कृपा करा. स्वतःला जपा. तुम्ही तुमच्या माणसांना हवे आहात. साधी अंगाला सुटणारी खाज घातक ठरू शकते!!