– राजेंद्र पां. केरकर
आसाममध्ये चहाच्या मळ्यात कामगार म्हणून हालअपेष्टांना सामोर्या जाणार्या गोव्यातल्या कुणब्यांच्या वेदनेला वाचा फोडून, त्यांची गुलामगिरीतून मुक्तता करण्यात यश मिळवले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत गोव्याच्या बर्याच सुपुत्रांनी महत्त्वाचे योगदान वेगवेगळ्या मार्गांनी केले होते. जनार्दन शिंक्रे, बाळकृष्ण बोरकर असे शेकडो तरूण वेळोवेळी स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात सहभागी झाले होते.
आजचा भारतीय स्वातंत्र्याचा दिवस यावा म्हणून इतर प्रांतातील स्वातंत्र्य सेनानींसारखेच पोर्तुगीज साम्राजाच्या ताब्यात असलेल्या भारताभिमानी गोमंतकियांनीही देशाच्या विविध भागांत वास्तव्यास असताना देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान केले होते.
सोळाव्या शतकात प्रारंभी तिसवाडी, सालसेत आणि बार्देश या प्रांतावर आपली सत्ता प्रस्थापित केल्यानंतर पोर्तुगीजांनी शेवटच्या दीड-दोनशे वर्षांत उर्वरित गोव्यावरती गुलामगिरी लादली. शैक्षणिक, आरोग्य व उद्योगधंद्याच्या क्षेत्रात भारतातील इतर प्रदेशात गोव्यापेक्षा जास्त सुविधा असल्याने येथील बरेच तरुण मुंबईसारख्या महानगरात स्थायिक झाले होते. पोटापाण्यासाठी नोकरी-धंदा करत असताना म. गांधींच्या सत्याग्रह चळवळीत त्याचप्रमाणे जहाल विचारसरणीच्या सशस्त्र क्रांतीत गोमंतकियांनी सक्रीय सहभाग घेतला होता.
यंदा ज्या स्वातंत्र्यसैनिकाचे जन्मशताब्दी वर्ष आहे, तसेच गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग शिरोडकर यांचे गोवा मुक्ती संग्रामाबरोबर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांशीही चांगले संबंध होते. सेनापती बापट, बाळुकाका कानिटकर आदी क्रांतिकारकांना शस्त्रे, दारुगोळा पुरविण्याचे कार्य शिरोडकर यांनी केले होते. त्याचप्रमाणे आफ्रिकेतील अंगोला देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सक्रीय सहभाग घेऊन त्यांनी बराच काळ यातनामय तुरुंगवास सोसला होता.
गोव्यातील केपे तालुक्यातील काकोडा गावातल्या बर्याच तरुणांनी म. गांधींच्या आवाहनाला अनुसरून १९४२च्या ‘भारत छोडो’च्या चळवळीत भाग घेतला होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य म्हणून मुंबईत काम करताना पत्रकार चंद्रकांत बापू काकोडकर यांना १९४२ च्या ‘भारत छोडो’च्या चळवळीत सक्रीय सहभागी झाल्याबद्दल अटक करून महाराष्ट्रातील नाशिक येथील तुरुंगात दोन वर्षे डांबले होते. २ जुलै १९४६ रोजी कुंकळ्ळीचे स्वातंत्र्यसेनानी आणि पत्रकार ज्योकीम डायस यांच्या समवेत म. गांधींची भेट घेऊन त्यांना पोर्तुगीजांनी गोव्यात चालवलेल्या धटिंगशाहीची कल्पना दिली होती. ज्योकीम डायस यांनी आपल्या विद्यार्थी दशेत भारतीय स्वातंत्र्य संग्राम चळवळीत कर्नाटकातल्या कॅसलरॉक परिसरात भाग घेऊन, बर्याचदा त्यासाठी तुरुंगवास पत्करला होता. काकोड्यातील दिवाकर बाळकृष्ण काकोडकर यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व स्विकारून स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला होता. मनोहर जयवंत काकोडकर यांनी मुंबईस प्रस्थान करून स्वतःहून वानरसेनेचा सैनिक होऊन सत्याग्रहात, प्रभातफेरीत सहभाग घेतला होता. विदेशी वस्तूंवर भारतीयांनी बहिष्कार घालावा म्हणूनही त्यांनी प्रयत्न केले होते. १९४२च्या ‘चले जाव’ चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना मुंबईतील भायखळ्याच्या तुरुंगात दोन महिने ठेवले होते. स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम काकोडकर यांनी म. गांधींच्या वर्धा येथील आश्रमात वास्तव्य केले होते. अच्युतराव पटवर्धन आणि एस. एम. जोशींसारख्या नेत्याशी त्यांचे संबंध होते. १९४२ ते १९४५ या कालावधीत ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते आणि यासाठी त्यांची रवानगी हिंडलगा येथील तुरुंगात करण्यात आली होती. त्यांचेच भाऊ रामनाथ केशव काकोडकर यांना भाऊ धर्माधिकारी यांच्यासोबत वेंगुर्ला येथे १९४२ रोजी अटक झाली होती. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा विचार सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी कार्य केल्याबद्दल त्यांना मालवण येथील न्यायालयाने सहा महिन्यांची सक्त मजुरीच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती.
पणजी येथील आत्माराम नरसिंह करमळकर यांनी १९३४ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सदस्यत्व स्विकारून ‘चले जाव’ चळवळीत भाग घेतला होता. म. गांधींच्या विचारांनी प्रभावित झालेल्यांमध्ये मये येथील विठ्ठल नारायण मयेकर यांनी घर सोडून सोळाव्या वर्षी मुंबईतल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या चळवळीत भाग घेतला होता. म्हापसा येथील सांतान सेबिस्ताव कार्व्हालो यांनी ९ ऑगस्ट १९४२ च्या गांधीजींच्या गोवालिया तलावाजवळील ‘भारत छोडो’च्या सभेत भाग घेतला होता. बेताळभाटीच्या आंतोनियो कार्व्हालो यांनी भारत छोडो चळवळीत भाग घेऊन भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पुणे शाखेचे सदस्यत्व स्विकारले होते. वेरोडा येथील डॉ. जॉन कार्व्हालो हे १९२९ पासून त्या चळवळीत सहभागी झाले होते.
भारतीय कामगार चळवळीतले राष्ट्रीय ख्यातीचे नेते पीटर आल्वारीस हे पर्राचे सुपुत्र. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी त्यांनी पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडियातली मोठ्या पगाराची नोकरी सोडली. चलेजाव चळवळीतल्या सहभागाबद्दल त्यांना दोन वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले होते. फ्रँक आंद्रादिस यांनी १९४५ साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी अँग्लो-इराणी तेल कंपनीतली नोकरी सोडली. तसेच १९४६ च्या वेगवेगळ्या चळवळींबरोबर भारतीय नौदलाच्या उठावाच्या समर्थनास झालेल्या बैठकांत भाग घेतला. गोव्यातल्या मुक्ती लढ्याचे एक महत्त्वाचे प्रवर्तक त्रिस्तांव ब्रागांझ कुन्हा यांनी आपल्या लिखाणातून फ्रेंच वर्तमानपत्रांत भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयी वस्तुस्थिती मांडून, जालियनवाला बागेत ब्रिटिशांनी घडवून आणलेल्या हत्याकांडाला वाचा फोडली. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सहकार्याने त्यांनी आसाममध्ये चहाच्या मळ्यात कामगार म्हणून हालअपेष्टांना सामोर्या जाणार्या गोव्यातल्या कुणब्यांच्या वेदनेला वाचा फोडून, त्यांची गुलामगिरीतून मुक्तता करण्यात यश मिळवले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत गोव्याच्या बर्याच सुपुत्रांनी महत्त्वाचे योगदान वेगवेगळ्या मार्गांनी केले होते. जनार्दन शिंक्रे, बाळकृष्ण बोरकर असे शेकडो तरूण वेळोवेळी स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात सहभागी झाले होते. सूर्यकांत अनंत लोटलीकर यांनी सातार्याचे पत्री सरकार म्हणून ओळखल्या जाणार्या नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांना शस्त्रे, दारुगोळा पुरविण्यात योगदान केले होते.
भारताला स्वातंत्र्य मिळणार हे जेव्हा निश्चित झाले आणि त्याचवेळी एकाच राष्ट्राचे दोन तुकडे होण्याची वेळ आली. धार्मिक कलह शिगेला पोहचला तेव्हा कविवर्य बा.भ.बोरकर यांनी ३० जुलै १९४७ रोजी ‘स्वातंत्र्याचा दीपोत्सव’ नावाची कविता लिहिली होती-
घाम आपुल्या शिरीं, बापुजी, घाव आपुल्या उरी
स्वातंत्र्याची अशा दिवाळी कशी करू साजरी?
बोरकरांची ही कविता त्यावेळचे दर्दभरे वास्तव समूर्त करण्यात यशस्वी ठरली होती. गोवा पोर्तुगीजांनी जिंकून घेतला तरी तो भारताचा अविभाज्य घटक आहे आणि त्यामुळेच गोव्यातले तरुण भारतात जेथे गेले तेथे त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेऊन आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्याचे कार्य केले. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यदिनापासून पोर्तुगीज अमदानीत भारताचा तिरंगा ध्वज गोव्यात फडकवणे गोवेकरांनी आपले कर्तव्य मानले!